Sunday, April 10, 2016

सर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्रकाशन झाले. यावेळी डावीकडून विठ्ठल पाथरूट, केंद्राचे संचालक दीपक पाटील, पीपल्स रिपाइंचे नेते राजाभाऊ इंगळे, ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर, जी. एम. ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, सिद्धाराम पाटील.

मनातील अस्पृश्यता संपायला हवी : करमरकर
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तेजस्वी आणि प्रेरणादायी महापुरूष होते. पिचलेल्या समाजासाठी त्यांनी देशभर उभ्या केलेल्या चळवळीमुळे कायद्याने अस्पृश्यता संपली; पण सामाजिक न्यायाची भावना संपूर्णत: प्रस्थापित होऊन प्रत्येकाच्याच मनातील अस्पृश्यता संपली तरच बाबासाहेबांचे स्वप्न साकार होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अरूण करमरकर यांनी आज येथे केले.
डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राच्या विवेक विचार या मासिकाकडून काढण्यात आलेल्या अभिवादन विशेषांकाचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी करमरकर बोलत होते. माजी सनदी अधिकारी विठ्ठल पाथरूट, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ इंगळे, विवेकानंद केंद्राचे संचालक दीपक पाटील, संपादक सिध्दाराम पाटील मंचावर होते.




करमरकर म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनात लहानपणापासून अनेक अन्याय झेलले. अस्पृश्यतेसारख्या अमानुष अन्यायाची धग सोसली; पण यावर त्यांची प्रतिक्रिया सूड भावनेची नव्हती. राज्यघटनेचे एकेक कलम लिहिताना त्यांनी सामाजिक न्यायाचाच विचार केला. न्यायनिष्ठा, समाजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा हे बाबासाहेबांच्या जीवनाचे पैलू होते. सामाजिक न्यायाचाच त्यांनी जीवनभर ध्यास घेतला होता.

बाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या आपल्या पक्षाचे अधिवेशन आयोजित केले होते. तेव्हा वीस हजार महिला उपस्थित होत्या. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी या महिलांना स्वत:ला अस्पृश्य मानू नका, असा संदेश दिला. गुरांचा मृतदेह न वाहण्याचे आणि दारू न पिण्याचे आपल्या पतीला सांगा याच बरोबरच अर्धपोटी राहून आपल्या मुलांना शिकवा, असा महिलांना संदेश दिला, असे सांगून करमरकर म्हणाले की, बाबासाहेबांच्या जीवनात एकच सकारात्मक बाब होती, ती म्हणजे त्यांचे माता - पिता. वडील लष्कराच्या सेवेत होते. त्यांनी मुलाच्या शिक्षणाला महत्त्व दिले. विलायतेत शिक्षणासाठी जाण्यापूर्वी बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाड यांना आपल्या तेथील शिक्षणाचा उद्देश सांगितला. तेव्हा ते म्हणाले होते की, मला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक वित्तव्यवस्था हे विषय शिकायचे आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी मला विषयांचे शिक्षण घ्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते.

प्रारंभी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सागर सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रशांत बडवे, कवी मारूती कटकधोंड, शांतीवीर महिंद्रकर, प्रमोद खांडेकर, प्रशांत गायकवाड यांच्यासह श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

http://epaper.lokmat.com/newsview.aspx?eddate=04/10/2016&pageno=3&edition=90&prntid=1714&bxid=25894124&pgno=3

No comments: