Tuesday, May 3, 2011

रवींद्रांच्या दृष्टिकोनातून "ती'

रवींद्रनाथ टागोरांचा जन्म 1861 सालच्या वैशाखात झाला. इंग्रजी
कालगणनेनुसार 9 मे रोजी त्यांना जन्मून 150 वर्षे होत आहेत. हे पूर्ण
वर्ष त्यांची जन्म-सार्धशत वर्ष म्हणून साजरे होतेय. रवींद्रनाथांचे नाव
माहीत नसलेली व्यक्ती विरळाच. भारतातील प्रादेशिक साहित्यामध्ये
रवींद्रांचे नाव सर्वात प्रथम घ्यावे लागेल. प्रत्येक भारतीयाच्या तोंडी
हे नाव पोहोचलं ते त्यांच्या "जन-गण-मन' या राष्ट्रगीतामुळे. भारत आणि
बांगलादेश या दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये यांचेच राष्ट्रगीत गायले जाते,
हे एक याचे वैशिष्ट्य आहे. त्यांना "कविगुरू' किंवा "विश्वकवि' असेही
म्हणतात. नोबेल पुरस्कार मिळविलेले हे पहिले भारतीय. जाज्वल्य
राष्ट्रभक्तीमुळे त्यांना मिळालेल्या "सर' आणि "नाईट' - या उपाधि त्यांनी
परत केल्या होत्या.
आपल्या देशात अनेक वर्षांपासून महिला राजकारणात असूनही महिला-बील हा शब्द
मात्र आत्ता समोर आला आणि वृत्तपत्रांमध्ये महिलांबद्दल भरभरून लिहून
यायला लागले. याच दृष्टीने रवींद्रनाथांच्या दृष्टिकोनातून "ती' याचा
विचार करण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्यांच्यात
उपजतच एक भावुकता होती. जी साधारणपणे स्त्रियांमध्ये आढळते. बंगालला
निसर्गानेच भरभरून दिलेले आहे. तिथल्या संस्कृतप्रचूर भाषेतही ही
संपन्नता दिसून येते. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, हे
त्यांच्या केवळ एका राष्ट्रगीतातूनही दिसून येते, पण त्यांच्या काव्यात
कठेार वर्णांचा उच्चार कमी होता. संपूर्ण राष्ट्रासाठी गीत लिहायचे असेल,
तर संस्कृतभाषाच सगळ्यात सोयीची असे त्यांनाही वाटले. त्याकाळी प्रत्येक
भाषाप्रभूचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, हे आपण सगळे जाणतोच.
80 वर्षांच्या आयुष्यात रवींद्रनाथांनी भरभरून लेखन केले. त्यातील
अधिकाधिक भाग स्त्रीकेंद्रित आहे. त्यांच्या काव्यसंग्रहांची केवळ
नावेसुद्धा त्यासाठी पुरेशी आहेत. चैताली, पलातका, चित्रा, मानसी, बलाका,
प्रकृति, पूजा, गीतांजली, सॅंजुति, खिया इ. अनेक त्यांच्या बऱ्याच
साहित्यात स्त्रियांचे प्रश्न समाजासमोर मांडलेले आहेत. त्यातील "चौखेर
बाली' ही साधारण सर्वांना माहीत असलेली कादंबरी. उघड्यावर असलेली स्त्री
ही कशी सगळ्यांची संपत्ती मानली जाते, हे यात मांडलेले आहे.
रवींद्रनाथ घरचे तसे संपन्न, सुस्थितीतले, सुसंस्कृत घराण्यातले, दिसायला
सुंदर आणि सौंदर्याचे पुजारी होते. "चित्रांगदा' हे त्यांचे सर्वांगसुंदर
नृत्यनाट्य. चित्रांगदा मणिपूरची राजकन्या असते. तिच्या वडिलांना
शिवाकडून त्यांच्या वंशात मुलगी होणार नाही, असा वर मिळालेला असतो. तरीही
ती जन्माला येते. ती म्हणजे मी शिवाच्या वराचा भेद करून मुलगी म्हणूनच
जन्माला आली, पण तिचे संगोपन मुलाप्रमाणेच केले गेले. दिसायलाही ती
साधारणच होती, पण एकदा पर्वतीय प्रदेशात जाणाऱ्या अर्जुनाला पाहून
त्याच्या प्रेमात पडली, पण तिच्या सामान्य रूपामुळे अर्जुन काही बघत
नाही. त्यामुळे ती अपमानित होते. मदनाकडे प्रार्थना करते. एका वर्षासाठी
सुंदर बनव असे म्हणते. ती सुंदर झाल्यावर मात्र दोघांचे मिलन होते, पण
तिच्या मनात खंत असते ती ही की याने फक्त माझ्या बाह्यरूपाला स्वीकारलं
आहे. खरं तर मी जशी आहे तशीच त्याने मला स्वीकारलं पाहिजे. म्हणून ती
पुन: मदनाला शेवटच्या दिवशी प्रार्थना करते की, माझं रूप परत घे.
अर्जुनाला सांगते, "मी एक स्त्री आहे. देवी नाही, पण मी चारचौघींसारखी
सामान्य स्त्रीही नाही. तुम्ही माझी पूजा करून मस्तकी बसवावं हे मला नकोच
आहे. पण अवहेलना करून बाजूला करणेही मला नको आहे. शेवटी ती म्हणते जर तू
मला आपल्या बाजूला ठेवून सगळ्या सुख-दु:खात वाटेकरी करणार असशील, तरच मी
तुला साथ देईन.' या सर्वांगसुुंदर काव्यात स्त्रीचे बाह्यसौंदर्य न बघता
एक सच्ची जीवनसाथी म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे हा संदेश दिलेला आहे.
गुजराथमधील मुलींनी एकदा त्यांना विचारले-पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये
स्त्रियांना यथार्थ सन्मान आतापर्यंत का मिळाला नाही? त्यावर ते म्हणाले
पुरुषांनी स्त्रीचे यथार्थ रूप खऱ्या अर्थाने अजून ओळखले नाही. तिला केवळ
उपयोग्य वस्तू मानले. हाच स्त्रीचा सगळ्यात मोठा अपमान आहे, पण काही
स्त्रियांना याच गोष्टीचा अभिमान वाटतो. या काही स्त्रियांना हाच विचार
बदलण्यासाठी त्यांनी स्वत:च प्रयत्न करायला हवा. हाच विचार त्यांच्या
चित्रांगदामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे.
डोळ्यावर पट्टी बांधून पतीबरोबर अंधत्व स्वीकारणाऱ्या गांधारीवरचे
"गान्धारिर आवेदन' या काव्यात त्यांची चिंतनशीलता दिसून येते. या काव्यात
गांधारी स्वत:चा पुत्र दुर्योधनाचा तुम्ही त्याग करावा, असे
पुत्रप्रेमाने अंध झालेल्या धृतराष्ट्राला अनेक परींनी विनविते. जी
गांधारी पतिनिष्ठेने बांधलेले डोळे दुर्योधनासाठी एकदाच उघडते. ती
गांधारी रवींद्रांच्या या काव्यात मात्र अतिशय सडेतोड प्रामाणिक
सत्प्रवृत्त दाखविली आहे.
प्रकृतिप्रेमी, पुष्पप्रेमी रवींद्रांचे षड्‌ऋतूंवर एक नितांत सुंदर काव्य आहे.
"श्यामा' या त्यांच्या प्रसिद्ध कादंबरीत स्त्री ही प्रेमासाठी कुठपर्यंत
पोहोचू शकते, प्रसंगी स्त्रिया कशा आक्रमक होतात हे मांडले आहे.
व्यापाराच्या निमित्ताने आपल्या देशात आलेल्या व्यापाऱ्याच्या प्रेमात
श्यामा पडते, पण काही कारणाने त्याच्यावर राजरोष ओढवतो आणि फाशी होते, पण
तिच्यावर पूर्वीपासून प्रेम करणाऱ्या युवकाला ती तो आळ घ्यायला लावून
फाशी स्वीकारायला लावते. व्यापाऱ्याला काही वर्षांनंतर हे कळल्यावर तोही
तिला सोडून जातो. "प्रेमासाठी वाट्टेल ते' या स्वभावाची ही स्त्री.
"प्रवाशी' या फार जुन्या बांगला भाषेतील मासिकात रवींद्रनाथांच्या गुजरात
भेटीचे आणि तिथल्या संवादांचे दीर्घ वर्णन आलेले आहे. 1920 च्या एप्रिल
महिन्यात महात्मा गांधींच्या निमंत्रणावरून रवींद्रनाथ मुंबईमार्गे
गुजरातला साहित्य संमेलनाचे सभापतिपद भूषविण्यासाठी गेले होते.
गुजरातमधील स्त्रिया आधुनिक विचारांच्या आहेत, असे त्यांचे मत होते.
एका प्रसंगी ते म्हणाले, ""स्त्रियांनी हे विसरू नये की, प्रत्येक
स्त्रीच्या आत एक गौरीचे रूप दडलेले असते.'' त्याच वेळी एक मुलगी त्यांना
विचारते नारी चरित्रात अशी कोणती विशेषता आहे की, जी तुम्हाला सगळ्यात
महत्त्वाची वाटते. त्यावर त्यांनी उत्तर दिले होते, ""कुठल्याही
आदर्शासाठी स्त्री ही आत्मसमर्पण करते हे स्त्रियांच्या चरित्राचे
वैशिष्ट्य आहे.'' त्यावर ती मुलगी म्हणते, "विधात्याने या आदर्शापायी
स्त्रिच्या कपाळी दु:खावर दु:खे लिहिली नाहीत काय?'' त्यावर त्यांचे
उत्तर होते. ""हो विधात्याने स्त्रीला कोमल बनविले म्हणून दु:खे ओढवतात,
परंतु हीच स्त्री कठीणातले कठीण व्रत करू शकते एवढी शक्तीही तिला दिली
आहे.'' यालाच आपण आता नैसर्गिक सहनशक्ती म्हणतो.
त्याचवेळी भावनगर येथील एका तपस्विनी वृद्धेच्या संवादात त्या इतक्या
सहजपणे घराबाहेर कशा पडू शकतात. (त्याकाळी) असा प्रश्न रवींद्रनाथांना
पडल्यावर तिने उत्तर दिले होते की, ""स्त्रीमध्ये ती शक्ती आहे, जशी टणक
जमीन भेदून वर येणाऱ्या एका कोवळ्या अंकुरात असते.'' त्यावर ते म्हणाले,
""आज मी स्त्रीचे सच्चे स्वत:चे बोल ऐकले. आजपर्यंत स्त्रिया पुनरुच्चार
करताना ऐकले होते.''
सुरत येथे वनिता आश्रमाच्या भेटीत एक स्त्री म्हणाली, ""मी विवाहविरोधी
आहे. लग्न करू इच्छित नाही.' त्यावर त्यांचे उत्तर होते, "प्रेम काही
तुच्छ नाही, पण हे प्रेम सगळ्यांच्या कल्याणाकरिता उपयोगी आणले पाहिजे.
लग्नानंतरचे प्रेम हे नियंत्रित प्रेम असते. अशाच प्रेमाचे गुणगान
कालीदास वगैरे सगळ्याच कवींनी केलेले आहे. प्रेमाशिवाय एकमेकांचा परिचय
होत नाही.'
पराक्रमी पुरुषाच्या वीरतेमध्ये स्त्रीसौंदर्याने बाधा येते का? अशा एका
प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणतात, सुंदर स्त्री युद्धावर निघालेल्या
पुरुषाला ओवाळते तेव्हा पुरुषाचा पराक्रम वाढतोच. ते सौंदर्य त्याला अडवत
नाही, पण स्त्रीने अयोग्य पुरुषाला ओवाळले की त्याच्या दु:खाचा अंत होत
नाही.
एका ठिकाणी स्त्रियांनी त्यांना घरात बोलावून सत्कार आणि आदरातिथ्य केले.
तेव्हा ते म्हणाले, ""आतापर्यंत घराबाहेर (सार्वजनिक) सत्कार झाले. आज
घरात झाला. म्हणजे तुमच्या अंत:करणात मी थोडेसे माझे स्थान ठेवून जाऊ
शकेन. स्त्रियांना मनात स्थान मिळाले म्हणजे माझ्या लेखनाचे चिज झाले.''
रवींद्रनाथांच्या लेखनाचा आवाका फार मोठा आहे. त्यांच्या कवितेत गेयता
होती. ती कविता सुरावटीतूनच बाहेर यायची. त्यांच्या काव्यांना त्यांच्याच
चाली असत. "स्वरबितान' नावाचे त्यांचे गाण्यांच्या नोटेशन 10,10
व्हॉल्युम्स आहेत.
त्यांची पत्रोत्तरे हे ललित-लेखांचे एक अंगच होते. "पत्रावली' नावाने 19
व्हॉल्युम्स प्रसिद्ध झालेले आहेत. 1931 साली हे मोन्तो बालादेवी
नावाच्या एका अशिक्षित स्त्रीबरोबर त्यांचा साहित्यिक पत्रव्यवहार सुरू
झाला. त्यात रवींद्रांची तिला 10 वर्षांत 264 पत्रे गेलेली आहेत. त्यातील
साहित्यिक मूल्यही फार उच्च दर्जाचं आहे. त्यात संवाद तर आहेच, पण त्या
स्त्रीची प्रतिवाद करण्याची हिंमतही त्यात दिसून येते. विश्वभारतीनेही
सगळी पत्रे मुद्रित केलेली आहेत.
शिशू आणि शिशू भोलानाथ या त्यांच्या काव्यात आई-मुलांचा विलोभनीय संवाद आहे.
वसंत ऋतूत एकदा गाडीतून जात असताना त्यांना भोवताली खूप फुलं फुललेली
दिसली. त्याने ते मोहून गेले. तेव्हा शेतात एक आम्रवृक्ष पानांनी,
मोहोरांनी पूर्ण बहरून गेलेला दिसला. तेव्हा त्यांना वाटले, फुले काय
काही दिवसांत सुकून जातील, पण हा वृक्ष शाश्वत सत्य आहे. त्यांच्या
संपूर्णच लिखाणात ही शाश्वताची आश्वासकता आढळून येते. विधात्याची
शाश्वतता आणि प्रकृतीची सुंदरता यावर रवींद्रनाथांची नितांत श्रद्धा
होती.

--
visit @
www.psiddharam.blogspot.com

Thursday, April 14, 2011

मोझेसच्या पाऊलखुणा

-
मल्हार कृष्ण गोखले
मुंबई

शिमला, कुलू-मनाली, दार्जिलिंग किंवा
नेपाळ अशा पर्यटन सहलींप्रमाणेच धार्मिक पर्यटन सहलीही आपल्याकडे
चांगल्याच लोकप्रिय आहेत. फक्त धार्मिक स्थळांची माहिती कुणी नीटशी देत
नाही. कित्येकदा लोकांनाही नीट माहिती करून घेण्यात स्वारस्य नसतं.
युरोपमधील इटलीसारख्या देशामध्ये पर्यटन सहलीत सेंट पीटर्ससारखी भव्य
चर्चेस अर्थातच असतात. पण त्यात धार्मिक स्थळाला भेट या हेतूपेक्षा तिथली
अप्रतिम कलाकारी पाहणं हा मुख्य हेतू असतो.इजिप्तमधल्या रफिक बुत्रोस या
पर्यटन संस्थाचालकाने मात्र वेगळी वाट शोधून काढली आहे. इजिप्तमध्ये
आलेल्या पर्यटकांना पिरॅमिड्‌स, राजा रामसिसच्या भव्य मूर्ती, नाईल नदी,
अलेक्झांड्रिया बंदर अशा नेहमीच्या स्थळांखेरीज आणखी काय दाखविता येईल,
याचा विचार करता करता त्याला एकदम आठवण झाली ओल्ड टेस्टामेंटची. बायबलचे
दोन भाग आहेत. ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट. ओल्ड टेस्टामेंटला
ज्यू लोक पवित्र मानतात. या ओल्ड टेस्टामेंटमध्ये एक्सोड्‌स नावाचं
प्रकरण असून, त्यात ज्यू लोक मोझेसच्या नेतृत्वाखाली इजिप्तमधून कसे
निसटून गेले, याचा कथाभाग येतो. रफिक बुत्रोसने एक्सोड्‌सचा कसून अभ्यास
केला आणि इजिप्तमधील मोझेसशी संबंधित अशी स्थळं शोधून काढली. मग आपल्या
पर्यटन संस्थेच्या एका सहलीला त्याने नाव दिलं, 'मोझेसच्या पावलावर!'
आमच्या धार्मिक पर्यटन सहलीत सामील व्हा आणि मोझेसच्या पावलावर पाऊल
टाकून प्राचीन तीर्थस्थळांचे दर्शन घ्या!त्याच्या या नव्या सहलीला चांगला
प्रतिसाद मिळू लागला आहे. केवळ ज्यू धर्मीयच नव्हे, तर युरोप-अमेरिकेतील
ख्रिश्‍चन आणि मध्य पूर्वेतले अरबही मोझेसच्या खाणाखुणा बघायला
उत्सुकतेने जात आहेत. पण कोण होता हा मोझेस? त्याच्याबद्दल पर्यटकांना
इतकी उत्सुकता निर्माण होण्याचं कारण काय?ज्यू आणि अरब हे आज एकमेकांशी
कितीही भांडत असले, तरी दोघांचा मूळपुरुष एकच आहे, तो 'सेम' या नावाने
ओळखला जातो. म्हणून ज्यू आणि अरब या दोघांनाही 'सेमेटिक' वंशाचे म्हणूनच
ओळखलं जातं. या सेमेटिक वंशीय लोकांचे मूळ स्थान उत्तर अरबस्थानात होतं
असं मानतात. तेथून हे लोक सर्वत्र पसरले. या सेमेटिक वंशीय लोकांपैकी एक
माणूस अब्राहम हा 'ऊट' या प्रदेशात रहात होता. ऊट हा प्रदेश सध्या
इराकमध्ये येतो. अब्राहमला परमेश्‍वराचा आदेश मिळाला की, 'मी दाखवीन त्या
भूमीत जाऊन रहा.' या आदेशानुसार अब्राहम पॅलेस्टाईन म्हणजे तत्कालीन कनान
या प्रदेशात जाऊन राहिला. अब्राहमचा विस्तारलेला वंश म्हणजेच आजचा ज्यू
समाज.अब्राहमचा नातू जेकब याला बारा मुलगे आणि सत्तर नातू होते. या विशाल
कुटुंबासह जेकब कनान प्रांतात शेळ्या-मेंढ्यांचे कळप घेऊन भटके जीवन
घालवीत असताना भयंकर दुष्काळ पडला. तेव्हा अर्थातच सुपीक, समृद्ध
भूमीच्या शोधात जेकब दक्षिणेकडे गोशेन प्रदेशात गेला. हा प्रदेश त्यावेळी
इजिप्तच्या साम्राज्यात होता आणि इजिप्तवर सेमेटिक वंशाचाच राजा राज्य
करत होता. त्यामुळे जेकब आणि त्याच्या विशाल परिवाराला गोशेन प्रांतात
उदार आश्रय मिळाला. इजिप्तमध्ये जेकबला इस्रायल असं नाव पडलं. हा काळ
साधारण इ. स. पूर्व १७०० हा मानला जातो. तिथून पुढे सुमारे दीडशे वर्षे
जेकबचा परिवार जो लवकरच एका छोट्या लोकसमूहात परिवर्तित झाला व
सुखासमाधानाने जगला. पण इ. स. पूर्व १५८३ च्या सुमारास इजिप्तमधील
सेमेटिक राजवंशाची सत्ता जाऊन तिथे फरोहा राजांची सत्ता आली. त्यांनी
ज्यू लोकांना गुलाम बनविले. गुलामगिरीत पिचणार्‍या एका सर्वसामान्य ज्यू
जोडप्याच्या पोटी मोझेसचा जन्म झाला. ज्यू गुलामांचं पहिलं अपत्य मारून
टाकण्यात यावं, अशी राजाज्ञा त्यावेळी निघाली होती. म्हणून मोझेसच्या
आईने त्याला बांबूच्या टोपलीत ठेवून नाईल नदीत सोडून दिलं. ती टोपली
नेमकी सापडली सम्राटाची बहीण नेफरटीटी हिला. हिब्रू शब्दाचा अर्थच मुळी
'पाण्याने वहावलेला.' साहजिकच मोझेसचं पालनपोषण राजपुत्र म्हणून झालं.
पुढे त्याला आपलं मूळ आणि कूळ कळल्यावर, गुलामीत पिचणार्‍या आपल्या
समाजाला घेऊन तो सिनाई पर्वताकडे निघाला. या पळणार्‍या गुलामांचा पाठलाग
शस्त्रसज्ज इजिशियन सैन्य करीत होतं. इथे दैवी चमत्कार घडला. पळणार्‍या
ज्यूंच्या मार्गात आडव्या आलेल्या लाल समुद्राचं पाणी दुभंगलं. ज्यू समाज
सुखरूप पार गेला आणि पाणी परत पहिल्यासारखं झालं. इजिप्तची सेना अलीकडेच
अडकून राहिली.सिनाई पर्वताच्या आसपासच्या रेताड प्रदेशात मोझेस आणि
त्याच्या समाजाला चाळीस वर्षे काढावी लागली. या कालखंडात ज्यू समाजातले
सगळे दोष उसळून वर आले. इजिप्तच्या गुलामगिरीतून केवळ मोझेसच्या
नेतृत्वामुळे मुक्त झालेले हे ज्यू त्याच्याचविरुद्ध उठले. शेवटी सिनाई
पर्वताच्या माथ्यावर मोझेसला दैवी आदेश प्राप्त झाला. याच त्या
सुप्रसिद्ध 'टेन कमांडमेंट्‌स' किंवा दहा आज्ञा. या दैवी आज्ञांच्या
आधारावर मोझेसने आपला समाज सुसज्ज आणि सुसंघटित केला.अशा प्रकारे मोझेस
या कर्तबगार आणि दैवी कृपाप्राप्त पुरुषाने इस्रायल राष्ट्राचीच एक
प्रकारे निर्मिती केली. ज्या दिवशी मोझेसला परमेश्‍वराकडून दहा आज्ञा
मिळाल्या तो दिवस आजही ज्यू समाजात 'शाबाथ' या नावाने साजरा केला
जातो.चाळीस वर्षे सिनाई प्रदेशात काढल्यानंतर हे इस्रायली लोक हळूहळू
जॉर्डन नदीच्या पलीकडील दक्षिण कनान प्रांतात सरकू लागले. तिथले कनानाईट
लोकही मूळचे सेमेटिकच असल्यामुळे हे दोनही समाज हळूहळू एकमेकांत मिसळून
गेले. पुढे अनेक लढाया, हल्ले इत्यादी घालमेली होत असतानाच हे लोक
मेंढपाळ जीवनाकडून कृषी जीवनाकडे प्रगत होत होते. एका युद्धात सॉल या
आपल्या नेत्याला त्यांनी 'राजा' म्हणून घोषित केलं. इस्रायलचा हा पहिला
राजा. नंतर डेव्हिड या राजाने गाझा ते जोप्पा या भागात राज्य करणार्‍या
फिलिस्टिनी लोकांचा पराभव करून जेरुसलेम हे बुलंद ठाणं जिंकलं. डेव्डिडचा
मुलगा सॉलोमन याने जेरुसलेममध्ये येहोवा या आपल्या देवाचं एक अतिविशाल
मंदिर बांधलं.एकंदरीत इजिप्तच्या गुलामगिरीतून ज्याने ज्यू समाजाला
सोडविलं आणि त्या समाजाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची अस्मिता
दिली, त्या मोझेसबद्दल ज्यूंना अतिशय आदर वाटावा, हे साहजिकच आहे. पण
पराभूत, गुलामी मनोवृत्ती भिनलेल्या, नालायक आणि विश्‍वासातकी अशा ज्यू
समाजाचा उद्धार करणारा मोझेस हा खरोखरच एक कुशल संघटक आणि महान नेता असला
पाहिजे, या भावनेने ख्रिश्‍चन आणि अरबांनाही त्याच्याबद्दल कुतूहल वाटतं.
येशू ख्रिस्त ऊर्फ जोशुआ हा स्वत: ज्यूचं होता, त्याच्या अनुयायांना
ख्रिश्‍चन म्हणतात. त्यामुळेच अब्राहम, जेकब, मोझेस, डेव्हिड, सॉलोमन या
सगळ्यांना ख्रिश्‍चन धर्मीय मानतातच. अरबांनी इसवीसनाच्या
सहाव्या-सातव्या शतकात इस्लामचा स्वीकार केला. पण तेही इब्राहिम, याकूब,
मूसा, दाऊद, सुलेमान या नावांनी वरील सगळ्या मूळ ज्यू नेत्यांना मानतात.
इतकंच नव्हे, तर येशूलाही ते ईसा या नावाने मान देतात् म्हणजे पैगंबर
म्हणतात. मात्र, त्यांचं यापुढचं म्हणणं असं की, महंमद हा शेवटचा पैगंबर
होय. त्याच्यानंतर कुणीही पैगंबर झाला नाही, होणारही नाही. त्यामुळे
त्याने जे काही म्हटलेलं आहे ते अंतिम सत्य आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
ते कसंही असो. रफिक बुत्रोस या कल्पक पर्यटन संस्थाचालकाने मोझेसच्या या
एक्सोड्‌समधील म्हणजे इजिप्तमधून आपल्या समाजाला घेऊन बाहेर पडण्याची अशी
बत्तीस ठिकाणं शोधून काढली आहेत. रफिक बुत्रोसच्या या उद्योगावरून
प्रेरणा घेऊन दुसर्‍या एका पर्यटन संस्थेचा चालक कामेल शेनुदा हा
इजिप्तमधल्या कॉप्टिक चर्चच्या साहाय्याने एक वेगळीच योजना तयार करतो
आहे. (इजिप्तमधले ख्रिश्‍चन कॅथालिक किंवा प्रोटेस्टंट नसून काप्टिक
पंथीय आहेत.) येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी पॅलेस्टाईनवर रोमनांची
अधिसत्ता होती. रोमनांपासून बचाव करण्यासाठी जोसेफ आणि मेरी बाल येशूला
घेऊन इजिप्तमध्ये पळून गेले होते. या तिघांनी जिथे जिथे मुक्काम केला
होता, अशा ठिकाणांची तपशीलवार यादी करून तिथे पर्यटन सहल आयोजित करायची,
अशी कामेल शेनुदाची कल्पना आहे. (साभार : तरुण भारत)

--
visit @
www.psiddharam.blogspot.com

मामाच्या गावाला जाऊ या...

- अलका रविंद्र नेरकर
नांदगांव (नाशिक)

अलिकडे सुट्टीतले छंदवर्ग आपल्या मुलांना 'ऑल राऊंडर' बनविण्यासाठी
पालकांनी शेाधलेला शॉर्टकट... मग मामाच्या गावी मुले तेच तर शिकत नव्हते
का?

रोजचे रुटीन, शाळा-परीक्षा-अभ्यास या चक्रातून फिरत असताना कुठेतरी तोच
तोचपणा-मरगळ आलेली असते. त्यातून सुटण्यासाठी आणि नव्या रुटीनला सामोरे
जाण्यासाठी आयुष्यात बदल हवा असतो. त्यासाठी मुलांना मामाच्या गावाला
जाण्याचा उत्तम पर्याय होता. ते नुसतेच मामाच्या गावाला जाणे नसते.ही
नात्याची वीण पक्की करण्याचा भाग होता. कुठेतरी बरोबरीच्या नात्यांमध्ये
मिसळणे असते. सुख-दुःख, ताण-तणाव त्या-त्या वयातल्या समस्यांची मुले
आपल्या आपण उकल करत एकमेकांना सहन करायचे... एकमेंकांमध्ये सहभागी
व्हायचे... एकमेकांच्या कला-गुणांची, देवाणघेवाण करायची. थोडक्यात
'शाळेबाहेरचे व्यवहारिक शिक्षण' मिळवून देण्याची ही मुक्त शाळाच नव्हे
का?आई-बाबांच्या धाकात अभ्यास आणि अति जपणूक यामध्ये वावरताना मुलांच्या
सुप्त मनात कुठेतरी उद्रेक होत असतो. त्याचा निचरा होण्यासाठी वेगळ्या
वातावरणाची पण काळजीने संभाळणार्‍या, मायेने शिकवणार्‍या नात्याची गरज हे
'मामाचे गाव' पूर्ण करते.अलिकडे सुट्टीतले छंदवर्ग आपल्या मुलांना 'ऑल
राऊंडर' बनविण्यासाठी पालकांनी शेाधलेला शॉर्टकट... मग मामाच्या गावी
मुले तेच तर शिकत नव्हते का? मनसोक्त हुंदडणे, निसर्गात रमणे, आंब्याच्या
झाडावर चढणे, कैर्‍या पाडणे, नदीमध्ये डुंबणे, पोहायला शिकणे, पडत-झडत
सायकल शिकणे... नवीन नवीन गावे पाहणे, गावांची वैशिष्ट्ये, निरीक्षण...
वेगळ्या चवीचे पदार्थ, फळे खाणे, नवे-नवे खेळ शिकणे, कलाकुसर करणे... मला
आठवते माझ्या लहानपणी कशीदा काढणे, भरतकामाचे टाके, उन्हाळी पांढर्‍या
फ्रॉकवर काढण्याचे आम्ही आजोळीच शिकलो.... कैरीचे पन्हे... आणि कैरीची
आंबट-गोड दाळ गूळ-शेंगदाणे कुटून केलेली भातुकलीतल्या ह्या रेसिपीज आम्ही
आपोआप शिकलो. कुठल्या महागड्या क्लासला जाण्याची वेळ आम्हाला कधी आली
नाही.मामाच्या गावी आई-बाबांचा धाक नसतो. मनसोक्त पत्ते खेळणे, कॅरम
खेळणे, गोष्टीची पुस्तके वाचणे... श्यामची आई, चांदोबा, कुमार ह्या
पुस्तकांमध्ये आम्ही गढून जात असू आणि मुख्य म्हणजे पानात पडेल ते
सर्वांबरोबर खाऊन संपवणे, घरी जेवणाला नाके मुरडणारी मुले मामे-मावस
भावंडाबरोबर न कुरकूर करता खातात. ही सहजीवनाची सवय लागते. अंगणातली ही
'अंगत-पंगत' भूक वाढवते!झाडांना झोके बांधून... उन्हाळ्यातही दाट झाडीत
दुपारची सुट्टी कशी थंडावा देई, घरी बनवलेले लाकडी पॉटमधील आईस्क्रीम,
ऊसाचा रस, कलींगडे, टरबूजे आणि सर्वांनी गोल करून एकत्र चाखलेले आंबे...
रात्री सर्वांनी जमून खेळलेल्या गावाच्या नावांच्या, गाण्यांच्या
भेंड्या... ह्या आजोळने आम्हाला काय म्हणून दिले नाही? झब्बू,
सट्टाझब्बू, गाढवपाणी, बदामसात, भिकार-सावकार, लॅडीस ही पत्त्यांची नावे
पुढच्या आयुष्यात पार पुसली गेली. गाण्याच्या भेंड्यात माम्या, आज्या पण
सामील होत असत. माझ्या एक मामी 'ह' आले की हमखास 'हरिणीवाणी आम्ही गवळणी
जातो यमुनेला श्याम पुढे आला' हे गाणे म्हणत. आजही हे गाणे ऐकले की
त्यांच्या आठवणीने मन व्याकूळ होते. 'ड' आले की 'डम डम डिगा डिगा' हे
त्याकाळचे एकमेव गाणे गायले जायचे. मुळाक्षरांची भाषेची समृद्धी अशी वाढत
जाई म्हणूनच आमचे मातृभाषेवरचे प्रेम असे घट्ट आहे.भेंडया खेळत खेळत
अंगणात टाकलेल्या भल्या मोठ्या सतरंजीवर आकाशातले तारे मोजत मोजत त्या
अथांग छताखाली झोपेच्या कुशीत कधी सामावून जायचे हे कळायचेही नाही आणि हे
उन्हाळ्याच्या सुट्टीचे... अंगावर मायेचा गारवा आणि स्वच्छंदी जीवनाचा
वारा पिऊन हुंदडणार्‍या कोकराचे दिवस संपत येतात... अधून मधून भरून
येणारे ढग.... जून आल्याची वर्दी देतात... शाळा सुरू होण्याची चाहूल
आणतात आणि मामे-मावस भावंडांची आणि आजोळी मैत्रीत गुंफलेल्या अनेक
सवंगड्यांची ताटातूट होणार या कल्पनेने मन हुरहुरते... डोळयांच्या कडा
ओलावतात आणि पुढच्या सुट्टीत भेटण्याचे ठरवून हे 'मामाचे गाव' तिथेच
ठेवून काढता पाय घ्यावा लागतो आणि मग कितीतरी दिवस या आठवणींच्या पुंजीवर
पुढचे दिवस आनंदात जातात...***
--
visit @
www.psiddharam.blogspot.com

अभूतपूर्व स्वागत

-
बी.निवेदिता
राष्ट्रीय उपाध्यक्ष, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी

एका वृत्तात म्हटले आहे की लोकसमूहाच्या त्या लाटा पाहून समुद्रही क्षणभर
अचंबित झाला अन् लाटानिर्मितीचे आपले काम विसरून अगस्ती ऋषीच्या या
वारसाचे स्वागत स्तब्ध होऊन पहात राहीला.

स्वामी विवेकानंद यांना घेऊन येणारी बोट जसजशी भारतीय किनार्‍यासमीप येऊ
लागली तसे संपूर्ण दक्षिण भारतात एक चैतन्य पसरले. त्यांच्या प्रति आदर
व्यक्त करण्यासाठी, त्यांचा बहुमान करण्यासाठी गावागावातून लोकांची तयारी
सुरु झाली. स्वामीजींचे एक सहकारी स्वामी निरंजनानंद हे त्यांच्या
स्वागतासाठी सिलोन येथे उपस्थित होते. बाकीचे बोट येणार तेथे जमले.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वामीजींच्या होणार्‍या आगमनाबद्दल संपूर्ण
भारतात उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांच्या स्वागतासाठी गावागावातून
स्वागत समित्या स्थापन झाल्या होत्या. या समितीत विविध पंथ-संप्रदायाचे
आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आपल्या आगमनाबद्दल
आपल्या देशबांधवांत किती औत्सुक्य निर्माण झाले आहे, याची खुद्द
स्वामीजींना कल्पना नव्हती. आपण विदेशात धर्मपताका डौलांनी फडकावली
त्यामुळे देशबांधव आनंदित झाले असतील याची त्यांना कल्पना होती. पण हा
आनंद किती पराकोटीचा आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. त्यानाच काय
कोणालाच कल्पना आली नाही असे ते अभूतपूर्व स्वागत होते. ज्याचे स्वागत
करायचे त्यांना आणि जे स्वागत करणार होते त्यांनाही या स्वागताच्या
भव्यतेची कल्पना आली नव्हती.१५ जानेवारी १८९७ ला सूर्यनारायण कोलंबोच्या
पूर्व दिशेस उगवले ते विजयपताका फडकावत. स्वगृही परतणार्‍या भारतमातेच्या
सुपुत्राच्या स्वागतासाठी हा सूर्य जसा उगवला तसेच स्वामीजी लक्षावधी
भारतीयांच्या हृदयात सहस्त्रसूर्याप्रमाणे उगवले. त्या प्रचंड
जनसमुदायाच्या भावना आणि दृगोच्चर होणारे प्रेम वर्णन करण्यास शब्द अपुरे
पडतात. स्वामीजींना घेऊन येणारी बोट लोकांना दिसताच त्यांनी जेट्टीवर एकच
गर्दी केली. लोकांच्या घोषणा आणि टाळ्याचा गजर यात समुद्र लाटांचा आवाज
लुप्त झाला. एका वृत्तात म्हटले आहे की लोकसमूहाच्या त्या लाटा पाहून
समुद्रही क्षणभर अचंबित झाला अन् लाटानिर्मितीचे आपले काम विसरून अगस्ती
ऋषीच्या या वारसाचे स्वागत स्तब्ध होऊन पहात राहीला. कोलंबो येथे झालेले
स्वामीजींचे स्वागत हे पहिले सार्वजनिक स्वागत होते. त्यानंतर प्रारंभ
झाला तो 'विजय ही विजय' या भव्य अभियानाचा. दक्षिणेचे टोक असलेल्या
कोलंबोपासून उत्तरेचे टोक असलेला अल्मोडा आणि नंतर राजस्थान अशा दिशेनेे
वर्षभर स्वामींचा स्वागत समारोह चालला होता. प्रांत आणि वेळ यानुसार
स्वागत समारोहात भिन्नता असलीतरी सर्वत्र उत्साह सारखाच होता. कोलंबो आणि
दक्षिणेतील इतर शहरात स्वामीजींची मिरवणुक ज्या मार्गाने जाणार त्या
मार्गावर सडे घालण्यात आले होते. आंब्याच्या पानांची तोरणे दारावर लावली
होती. संपूर्ण रस्त्यावर केळीचे खुंट लावले होते. रात्रीची वेळ असेल तर
लोकांनी रस्त्यावर मशाली पेटवून ठेवल्या होत्या. प्रत्येक घराबाहेर दिवे
पेटवलेले होते. 'स्वामीजींनी भारतात प्रकाश आणला' हे वाक्य शब्दशः खरे
ठरत होते. मांडव आणि पताका सर्वत्र होत्याच, एका प्रत्यक्ष दर्शीनुसार
देवाच्या मूर्तीवर छत्र असते ते छत्र स्वामींच्या डोक्यावर धरण्यात आले
होते. देवाचा वार्षिक उत्सव असतो व छबीन्यासाठी मूर्ती बाहेर काढली जाते
तेंव्हाच हे छत्र बाहेर काढले जाते. स्वामींची मिरवणूक जाताना हर हर
महादेवचा घोष चालला होता. सजवलेली घोडागाडी, किंवा बैलगाडी नेहमी असे पण
रामनदच्या राजांनी स्वामींची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली तर अल्मोडा
येथे सजवलेल्या घोड्यावरून मिरवणूक निघाली. स्वामींचा रथ रामनदच्या
राजांनी स्वतः ओढला. कलकत्ता आणि मद्रास येथे रथ ओढण्यात तरुणांचा
पुढाकार होता. एका वृत्तानुसार सभा संपली. स्वामी रथात बसले. रथ
राजनिवासाकडे निघाला. राजेसाहेब इतरांसोबत पायी चालले होते. थोडे अंतर
गेल्यावर राजांनी रथाचे घोडे सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर राजे व
इतरांनी रथ गावातून ओढत नेला. स्वामींच्या गौरवार्थ अनेक काव्यरचना
झाल्या. कोलंबो येथे 'थेवरम' म्हणण्यात आले. मिरवणुकीत वाद्यवृंदावर अनेक
भारतीय व इंग्रजी गाणी वाजवण्यात आली.त्यावेळचा हा उत्साह एवढा अमाप होता
की ते वर्णन आजही वाचताना आपलं अंग मोहरून येते. त्यापैकी कांही वर्णने
पुढील प्रमाणे आहेत.कोलंबो येथे ''वहातुकीसाठी जी जी साधने होती त्याचा
वापर करुन तसेच पायी चालत हजारो लोक पानाफुलांनी सजवलेल्या मंडपाकडे धाव
घेत होते. स्वामीजी रथातून उतरले. मिरवणुकीत सामील होऊन निघाले. ध्वज,
छत्र आणि श्वेतवस्त्र ही हिंदुच्या मानाची प्रतिके मिरवणुकीत होती.
वाद्यवृंद समयोचित धून वाजवत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुस मांडव होते.
दोन मांडवातील अंतर पाव मैल होते. दोन मांडवातील अंतरांत पानाफुलांनी
सजवलेल्या कमानी होत्या. स्वामीजी मांडवात शिरताच कृत्रिम कमळ उमलत असे,
त्यातून एक पक्षी बाहेर येई. पक्षाची मुक्ती म्हणजे भारतमातेच्या
शृखंलामुक्ततेचा संकेत होता. मात्र ही सारी सजावट तशी दुर्लक्षितच
राहीली. कारण सर्वांच्या नजरा स्वामीजींचा तेजपुंज चेहरा आणि चमकणारे
डोळे या कडे लागल्या होत्या. या ठिकाणी जणू भारतमातेचे स्वातंत्र्य
दृगोच्चर झाले.''जाफना येथे ''विश्वविख्यात योगीपुरुषाचे दर्शन
घेण्यासाठी आणि मिरवणुकीने स्वागत करण्यासाठी बेटावरील सर्व भागातून
हजारो लोक या शहरात जमले होते. जाफनातील कांगेसंतुरा हा मार्ग हिंदु
कॉलेजपर्यंत सायंकाळी ६ पासून गर्दीने एवढा फुलून गेला होता की त्यावरून
एकही वाहन जाणे अशक्य झाले. रात्री ८.३० ला मशाल मिरवणूक काढण्यात आली.
एका अंदाजानुसार १५ हजार लोक मिरवणुकीत सहभागी झाले. दोन मैल लांबीच्या
या रस्त्यावर माणसेच माणसेच होती. जणू हा मस्तकांचा समुद्र भासत होता.
असे असूनही अथ पासून इति पर्यंत सर्वत्र कमालीची शिस्तबद्धता होती. या
संपूर्ण मार्गावर जेवढी घरे होती त्या घराबाहेर नीरयकुडम आणि दीप ठेवले
होते. एखाद्याला परमोच्च मान देण्याचा हा हिंदु रिवाज आहे. प्रत्येक
घराने हा मान त्या थोर सन्यांसाला दिला.''रामगड येथे ''स्वामीजींची
प्रतिक्षा करणार्‍या हजारो लोकांना फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांच्या
आगमनाची सूचना देण्यात आली. स्वामी आल्यानंतर आणि मिरवणूक चालू असताना
आकाशात अनेक अग्नीबाण सोडण्यात आले. सर्वत्र आनंदी आनंद पसरला होता.
दरबाराच्या खास गाडीत स्वामीजी बसले होते. त्यांच्या शेजारी एक शरीर
रक्षक होता. महाराजांचे बंधू सर्वांवर देखरेख करीत होते. स्वतः राजेसाहेब
पायी चालले होते. स्वतः मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. रस्त्याच्या दुतर्फा
मशाली पेटल्या होत्या. भारतीय व पाश्चात्य संगीत मिरवणुकीच्या आनंदात भर
घालत होते. 'पहा जगज्जेता नायक आला' हे गीत स्वामीजींच्या आगमनाबरोबर
सुरु झाले. स्वामीजी मिरवणुकीने समारंभस्थळी पोहचले तेंव्हा निम्मी
मिरवणूक रस्त्यावरच होती. महाराजांच्या विनंतीनंतर स्वामींनी वाहन बदलले
नंतर ते शंकरा व्हिला येथे गेले.अल्मोडा येथे ः ''स्वामीजी येथे आले तो
दिनांक १० मे हा होता. प्रत्यक्षात स्वामींच्या स्वागताची तयारी जानेवारी
पासून चालू होती. गुडविन हा युरोपिय लेखक म्हणतो 'पारंपारिक पद्धतीने
निघालेल्या या मिरवणुकीत अल्मोडाचा प्रत्येक रहिवासी सामील झाला होता.
घराघरावर दीप असल्याने संपूर्ण शहरात दीपोत्सव सुरु असल्यासारखे भासत
होते. स्थानिक संगीत, लोकांच्या घोषणा यामुळे वातावरण भारून गेले होते.
स्वामीजींच्या बरोबर जे लोक कोलंबोपासून आले होते. त्यांनाही हे स्वागत
अपूर्व वाटले. प्रत्येक घरातून स्वामींच्या अंगावर फुले व तांदुळ उधळले
गेले.''शिकागोच्या धर्मसंसदेत स्वामीजींचे भाषण झाल्यापासून भारतीय
वृत्तपत्रांत स्वामींच्या प्रशंसेने रकानेच्या रकाने भरून मजकूर प्रसिद्ध
झाला. स्वामीजी कोलंबोस पोहाचल्यापासून त्यांच्यावर तारांचा पाऊस पडत
होता. त्यात अभिनंदन, शुभेच्छा, भेटीचे निमंत्रण, भाषणाचे निमंत्रण अशा
सर्व प्रकारच्या तारा होत्या. स्वामीजी राष्ट्रनायक बनले होते. त्यांच्या
रुपाने भारतमातेला आपला आत्मा गवसला होता. त्यांचा संदेश म्हणजे
भारतीयांना जागे करण्यासाठी दिलेली हाक होती. अनेक जणांची निमंत्रणे,
त्यांचा आग्रह यामुळे स्वामीजींना आपल्या कार्यक्रमांत वारंवार बदल करावा
लागत होता. रामनदच्या राजेसाहेबांच्या निमंत्रणाचा ते जसा स्वीकार करीत
तसाच इतरांना होकार देत. स्वामीजी २७ जानेवारीला आपल्या येथे येत आहे हे
कळताच महाराजांना पराकोटीचा आनंद झाला. लगेच त्यांनी हजारो गरिबांना
अन्नदान केले. प्रत्यक्ष स्वामीजी आले या आनंदाप्रित्यर्थ पुन्हा अन्नदान
आणि वस्त्रवाटप केले. १ डिसेंबरला खेत्री येथे जाण्यासाठी स्वामी
विवेकानंद रेवाडी जंक्शनवर आले. तेंव्हा खेत्री आणि अल्वारचे शेकडो लोक
आपल्या घोडागाडीसह आले होते. तेथे अल्वारच्या लोकांनी एवढा प्रचंड आग्रह
केला की स्वामींना खेत्रीच्या ऐवजी आधी अल्वारला जावे लागले.
पूर्वनियोजित कार्यक्रमातील अशा बदलामुळे पुणे, त्रिचनापल्ली येथे
स्वामीजींना जाता आले नाही. त्रिचनापल्ली येथे पहाटे ४ वाजता स्टेशनवर
हजारो लोकांनी एवढी गर्दी केली की स्वामींना बाहेर उतरताच आले नाही.
तंजावर येथेही याच कारणामुळे त्यांना डब्यातून बाहेर येता आले
नाही.मद्रासच्या पुढे एक लहानसे स्टेशन आहे. स्वामीजी होते ती रेल्वे
त्या स्टेशनवर थांबत नव्हती. हजारो लोक स्टेशनवर जमले. त्यांनी
स्टेशनमास्तरला गाडी थोडा वेळ थांबवण्याची विनंती केली. स्टेशनमास्तरने
असमर्थता व्यक्त केल्यावर त्या हजारो लोकांनी रुळावरच ठाण मांडले.
स्वामीजींच्या दर्शनासाठी ते आपल्या प्राणावर उदार झाले होते. गार्डने
समयसूचकता दर्शवल्यामुळे दुर्घटना टळली. गाडी थांबल्यावर स्वामीजी
डब्याबाहेर आले. रुळावर बसलेल्या लोकांशी बोलले लोकांना दुसरे काय हवे
होते? स्वामीजींचे डोळे भरून दर्शन. ज्या स्वामींनी लोकांना स्वाभीमान
परत मिळवून दिला. त्यांच्या खाजगी आणि राष्ट्रीय जीवनाला एक उद्दिष्ट
मिळवून दिले. त्यांच्या विश्वासाला एक भक्कम आधार मिळवून दिला.आगमनास एक
वर्ष पूर्ण झाले तरी स्वामी विवेकानंद यांना सत्काराची निमंत्रणे येतच
होती. सततच्या प्रवासाने ते थकले होते. एखादे निमंत्रण स्वीकारले की
जाताना किंवा येताना वाटेतील अनियोजित निमंत्रणांना तोंड द्यावे लागे.
परिणामी वेळापत्रक बिघडणे, वेळे अभावी ठरलेले कार्यक्रम रद्द करायला
लागणे असेही प्रकार घडत. या सर्व दगदगीचा स्वामी विवेकानंद यांच्या
प्रकृतीवर प्रतिकुल परिणाम झाला. प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात लोकांना
स्वामी विवेकानंद यांना पहायचे होते. आयुष्यभर उपयोगी पडेल असा संदेश
त्यांच्या मुखातून ऐकायचा होता. मानवजातीतील सर्वात प्राचीन आणि वैश्विक
वारसा म्हणजे वेदांत होय. याचा अर्थ जाणून त्या विषयी ते आश्वस्त होत.
शारिरीक दृष्ट्या प्रत्येक गावाला भेट देणे हे स्वामी विवेकानंद यांना
अशक्य होते. पण त्यांचा प्रभाव एवढा दुरगामी ठरला की त्यानंतर भारतीयांनी
प्रथम त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. नंतर शिकागो येथील भाषणाची
शताब्दि साजरी केली. या शताब्दि सोहळ्याची शृंखला थांबतच नाही. आता
भारतवासी त्यांची १५० वी जयंती साजरी करण्यास सज्ज झाले आहेत. स्वामी
विवेकानंद यांचे स्वागत पूर्णविराम न मिळता अजून चालू आहे.***

--
visit @
www.psiddharam.blogspot.com

नालंदातील अभ्यासक्रम

चिनी प्रवाशांनी मुक्त कंठाने गौरविलेल्या या विद्यापीठातील
अभ्यासक्रमाची माहिती आजही उद्बोधक ठरेल असे वाटते. नालंदा विहारात
प्रवेश मिळविण्यासाठी ज्या परीक्षा द्याव्या लागत त्यांचे कार्य
'द्वारपंडित' आचार्यांच्या हातात होते. या परीक्षेकरता लागणारे ज्ञान
आजच्या इंटर किंवा 'बारावी' च्या तोडीचे; किंबहुना त्यापेक्षा कंकणभर
जास्तच ठरेल. प्रत्येक विषयाकरता स्वतंत्र द्वारपंडित असत व त्यांनी
घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणे सोपे नसे. फार थोड्या विद्यार्थ्यांना
प्रवेश-पात्र ठरवले जात असे. द्वारपंडिताला लाच देऊन उत्तीर्ण होण्याची
कल्पना त्या काळी अस्तित्वात नव्हती. नालंदा म्हणजे आजच्या परिभाषेत
'प्रगत अनुसन्धान केंद्र 'Centre of Advanced Study'
मानले जात असे.भाषाशिक्षणाची विज्ञानाशी सांगडसाहजिकच येथील
अभ्यासक्रमात व्याकरण, गद्य-पद्य, साहित्य, तर्कशास्त्र (आन्वीक्षिकी),
योगविद्या यांच्याबरोबर महायान शाखा, जातकग्रंथ व तत्कालीन बौद्धांचे १८
संप्रदाय यांचा प्राधान्याने निर्देश करावा लागेल. म्हणजे हिन्दु धर्मा
बरोबर बौद्ध व जैन पंथाच्या अध्ययनालाही येथे भरपूर वाव होता.
स्वाभाविकपणे येथे आशियाखंडाच्या निरनिराळ्या भागांतून प्रवेशासाठी
येणार्‍या विद्यार्थ्यांची रांग लागलेली असे. योगविद्येबरोबर तंत्रविद्या
व महायानाबरोबरच 'हीनयाना' च्या अध्यापनाची येथे सोय होती.
धर्मग्रंथांशिवाय, चित्रकला, शिल्पशास्त्र, वैद्यकशास्त्र, गणितशास्त्र
यासारख्या व्यावहारिक विषयांचे पद्धतशीर शिक्षण येथे दिले जात असे हे
उत्खननातील अवशेषांवरून स्पष्ट होते. या विद्यापीठात शिल्पकला फारच प्रगत
झालेली होती हे येथे सापडलेल्या बांधकामाच्या व कोरीव कामाच्या
नमुन्यावरून लक्षात येते. त्या काळी छापखाने नसल्यामुळे निरनिराळे ग्रंथ
लिहून काढून त्यांच्या हस्तलिखित प्रती जपून ठेवाव्या लागत असल्यामुळे
हस्तलिखित तयार करण्यात वेळ जाई; पण त्यामुळे हस्तलिखित मोत्याच्या
दाण्यासारखे होई हे अमान्य करता येणार नाही. नालंदा येथे दहाव्या,
अकराव्या व बाराव्या शतकात लिहिलेले लेख पहावयास मिळतात असे
पुरातत्त्वेत्ते डॉ.अ.स.आळतेकर यांनी आपल्या 'एज्युकेशन इन एन्शिएन्ट
इंडिया' या पुस्तकात नमूद केलेले आहे. (हा ग्रंथ १९४४ मध्ये प्रकाशित
झाला). चीन, तिबेट वगैरे देशांतून शिक्षणेच्छू विद्यार्थी नालन्दात येत
असत अशी इतिहासाची साक्ष असल्यामुळे येथे निरनिराळ्या भाषाही शिकवल्या
जात असत हे अनुमान करणे भाग आहे. भाषाशिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन
यांमध्ये काही मुलभूत विरोध आहे असे गृहीत धरून भाषांच्या
अध्ययन-अध्यापनाकडे तुच्छतेने बघण्यात समाधान मानण्याच्या आजच्या काळात,
या जुन्या विद्यापीठाने या दोन्हीचा समन्वय साधला होता हे लक्षात
ठेवण्यासारखे आहे.(संदर्भ : भारतातील प्राचीन विद्यापीठे - मो. दि.
पराडकर, भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन. पृष्ठ : २८)***

--
visit @
www.psiddharam.blogspot.com

‘नालंदा’चे पुनरुज्जीवन : मूळ उद्देश हरवतोय ?

- अनिर्बन गांगुली
संशोधक, विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन, नवी दिल्ली

प्राचीन काळातल्या नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न
जारी आहेत. २००७ सालपासून सुरू असलेल्या या प्रयत्नांना व्यापक
प्रसिद्धीही मिळालेली आहे. हे काम बिहारमध्ये होणार आहे हे साहजिक आहे.
पण हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय मान्यता आणि पाठिंबा हवा असतो.
तसा तो मिळण्यासाठी आवश्यक ती पार्श्‍वभूमी तयार होत नाही. दृष्टीकोनाचा
अभाव आणि संभ्रम असे अडथळे त्यात येत आहेत. हा अभाव या प्रकल्पाविषयीच्या
आकसातून उद्भवला आहे आणि प्रकल्पाच्या प्रारंभापासूनच त्याला त्रासदायक
ठरायला लागला आहे.

या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी नेमण्यात आलेल्या आधार गटात काही बुद्धीवंत
आहेत, शास्त्रज्ञ आहेत, संशोधक, सनदी अधिकारी आहेत. पण तिबेटीयन समाजाचा
एकही प्रतिनिधी नाही. तिबेटी जनतेचा आणि नालंदा विद्यापीठाचा फार घनिष्ठ
संबंध आहे. तिबेटमधील सत्ताधारी आपल्या अधिपत्त्याखालील विद्यापीठात
नालंदा विद्यापीठातला स्नातक शिक्षक म्हणून नेमण्याचा प्रघात पाडलेला
होता. अशा शिक्षकांच्या प्रयत्नातूनच तिबेटच्या इतिहासातले सुवर्ण युग
साकार झाले होते. त्यामुळे नालंदा विद्यापीठातून शिक्षण घेऊन
येणार्‍यांना तिबेटमध्ये फार मान दिला जात असे.'नालंदा'मध्ये शिक्षण
घेतलेल्या या पंडितांनीच बुद्ध धर्माची तत्त्वे तिथल्या भाषेत अनुवादित
केली आहेत आणि त्यामुळेच तिबेट आणि चीनमध्ये बौद्ध मताचा प्रसार झालेला
आहे. आठव्या शतकातला तिबेटचा राजा ड्यू त्सान याने तिबेटमध्ये धर्म
प्रचारार्थ काही भारतीय पंडितांना पाचारण केले होते. आचार्य शांत रक्षित
हे त्यातलेच एक होते. त्यांनी तिथे केलेल्या कार्याची पावती म्हणजे
तिबेटी जनतेने त्यांना दिलेला 'आचार्य बोधिसत्व' हा सन्मान.हा संबंध
अर्वाचिन काळातही जारी राहील. नालंदा विद्यापीठाचा हा ज्ञानाचा दिवा
प्रज्ज्वलित ठेवणार्‍या दोन संस्था आजही भारतात आहेत. वाराणसी जवळील
सारनाथ येथे असलेले 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटन स्टडीज' आणि
लेह (लडाख) येथील 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट स्टडीज'. जवाहरलाल
नेहरू यांनी आपल्या मृत्यूच्या पाच दिवस आधी दलाई लामांंंशी चर्चा करताना
भारतात तिबेटी ज्ञानाचे जतन करण्यासाठी एखादी संस्था स्थापन करण्याचा
विचार बोलून दाखवला होता. हे सारे संबंध पाहिल्यावर नालंदा विद्यापीठ
पुनरुज्जीवन सल्लागार समितीवर तिबेटचा प्रतिनिधी किती आवश्यक आहे हे
लक्षात येईल. या सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. अमर्त्य सेन यांना, 'या
समितीवर दलाई लामा यांना का समाविष्ट करण्यात आलेले नाही?' असा प्रश्‍न
विचारला असता त्यांनी 'ते धार्मिकदृष्ट्या सक्रिय आहेत, त्यामुळे त्यांना
धार्मिक अभ्यासाविषयीच्या समितीवर घेणे उचित होणार नाही' असे उत्तर दिले.
धार्मिक असणे ही धर्माचा अभ्यास करण्यासाठी अपात्रता ठरवली गेली आहे. ही
बाब भारतीय तत्त्वज्ञानात तरी न बसणारी आहे.तसा चीनचाही या प्रस्तावाशी
संबंध आहे. कारण तिथेही दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात आचार्य धर्मदेव
यांना बौद्ध मताच्या चिनी अनुवादासाठी पाचारण केलेले होते. पण त्यामुळे
तिबेट-नालंदा संबंधाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तसा तर कोरियाचाही
नालंदाशी काही प्रमाणात संबंध आला होता, पण तिबेटच्या प्रतिनिधीत्वाला
संस्कृती-संगमाच्या दृष्टीने खास महत्व आहे. पण तिबेटला वगळून चीनला खूष
करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात एकेकाळी भारताने बौद्ध मताच्या
आधारे चीनसह त्या भागातल्या सर्व देशांतल्या लोकांची मने नालंदातील
शिक्षणाच्या आधारे घडवलेली आहेत.हा प्रकल्प साकार करणारी एजन्सी म्हणून
मनुष्य बळ विकास मंत्रालयाची नियुक्ती करण्याऐवजी परराष्ट्र खात्याची
नियुक्ती करण्यात आली आहे. असे का? असाही एक प्रश्‍न जाता-जाता विचारता
येतो. खरे तर ही मनुष्यबळ विकास खात्यासाठी शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय
विचार मांडण्याची एक उत्तम संधी होती. महत्वाचा प्रश्‍न आहे तो या
विद्यापीठाच्या स्वरूपाचा. पुनरुज्जीवित नालंदा विद्यापीठ हे
इंजिनियरींग, व्यवस्थापन शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान अशा
उपयोजित-भौतिक शास्त्रांचे शिक्षण देणारे आणखी एक विद्यापीठ असणार आहे
का? की नालंदा विद्यापीठाने पुरातन काळी जाग्या केलेल्या ज्ञानाच्या आणि
अध्यात्माच्या प्रेरणा पुन्हा जागृत करणारे खरेखुरे नालंदा विद्यापीठ
राहणार आहे? इतिहासतज्ञ आर.के. मुखर्जी यांनी 'मेन अँड थॉट इन एन्शिएण्ट
इंडिया' या आपल्या ग्रंथात नालंदा विद्यापीठातल्या त्या प्रेरणा आणि
शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन यांचे संक्षिप्त वर्णन केलेले आहे. नालंदा
विद्यापीठातल्या अभ्यासाला वैश्‍विक स्वरूप होते. जगाच्या सर्व भागातून
आलेल्या ज्ञानाचे तिथे स्वागत होत होते. सर्व पंथांच्या ज्ञानावर तिथे
चर्चा होत असे. चर्चा हीच तिथल्या ज्ञान ग्रहणाची पद्धत होती' असे श्री.
मुखर्जी यांनी म्हटले आहे. विचारांचे स्वातंत्र्य हा तिथल्या अध्यापन
शास्त्राचा आणि अध्यापन पद्धतीचा आधार होता. आताच्या विद्यापीठांनी हा
आधार गमावला आहे. पुनरुज्जीवित नालंदा विद्यापीठातही हीच 'निराधार'
पद्धती अवलंबिली जाणार असेल तर ती नालंदा 'स्पिरीट'ची कुचेष्टा ठरणार
आहे.या विद्यापीठात केवळ मानव्यशास्त्र, संस्कृती आणि इतिहास यांचेच
अध्यापन केले जाता कामा नये तर अन्यही विषय शिकवले जावेत असे जोरदारपणे
म्हटले जात आहे. सकृतदर्शनी या म्हणण्यात काही चूक नाही पण एका बाजूने
असाही प्रश्‍न केला जातो की, केवळ मानव्यशास्त्रांचाच अभ्यास करणारे
एखादे केंद्र का असू नये? आणि ते भारतात का असू नये ? भारतात
मानव्यशास्त्रातले किती तरी विद्वान, संशोधक आहेत पण तरीही विविध
विद्यापीठांत मानव्य शास्त्रांची अवस्था वाईट आहे. तेव्हा नालंदाच्या
आधुनिक अवतारालाच मानव्यशास्त्राचे आंतरराष्ट्रीय अध्ययन केंद्र बनवायला
काय हरकत आहे?नालंदा विद्यापीठाचे आणखी एक वैशिष्ट्य होते, ते होते
शिक्षण संस्थांच्या सामाजिक जबाबदारीचे. नालंदा विद्यापीठ हे समाज आणि
परिसर यातून अलग झालेले केवळ उच्च शिक्षण देणारे केंद्र नव्हते तर ते
ज्ञानदान करणारे आणि समाजाला अभ्यासू व विद्वान व्यक्ती उपलब्ध करून
देणारे केंद्र होते. एवढीच त्याची मर्यादित भूमिका नव्हती. ते रुग्णांना
औषधे देणारे औषधालय होते. ते निराधारांना आधार देणारे आश्रयस्थान होते
आणि अन्न छत्रही होते. तेव्हा आजही त्यांचे पुनरुज्जीवन करताना त्याला
विकासाचेही केन्द्र बनवता येते. एकंदरीत नालंदा हे असे एक जागतिक
कीर्तीचे विद्यापीठ होते जिथे जगातले सर्व धर्म आणि पंथांचे विद्यार्थी
ज्ञानार्जनासाठी जमत असत. जिथून चीन, अफगाणिस्तान आणि अन्यही अनेक देशांत
बौद्ध धर्माचा प्रसार झालेला होता. पंथ, धर्म, भाषा आणि देश वेगवेगळे
असले तरीही माणूस एकच आहे हा संदेश जगाला देणारे तत्त्वज्ञान याच
विद्यापीठात जोपासले गेले होते. मानवाला मानवाशी जोडणारा मानव्याचा धागा
बळकट करण्याचे ते स्थान बनले होते. त्या काळात जगात अस्तित्वात असलेल्या
सर्व संस्कृतींचा संगम या ठिकाणी झाला होता. आताही आपण या विद्यापीठाला
ते जुने वैभवशाली स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर
या विद्यापीठातून खरे खुरे जागतिक नेते शिकून बाहेर पडतील याची दक्षता
घेतली पाहिजे.
स्वैर अनुवादअरविंद जोशी

--
visit @
www.psiddharam.blogspot.com

संपादकीय april

'धर्म हा भारताचा आत्मा आहे. खरा भारत चंद्रमौळी झोपड्यात आहे.' हे
स्वामी विवेकानंद यांचे १०० वर्षांपूर्वीचे उद्गार आजही तेवढेच प्रासंगिक
आहेत. आज भारत जगातील एक महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. एकीकडे
अब्जाधिशांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कर्जाच्या विळख्यातून सुटका
करून घेण्यासाठी मृत्यूला कवटाळणारे लक्षावधी शेतकरी, वासनेचा बाजार,
गोत्र आणि जात पंचायतींची गडद होत असलेली जळमटं, शेजारील देशांत अनागोंदी
माजलेली, आपल्या परिपक्व लोकशाहीत भ्रष्टाचाराला आश्रय देणार्‍या वृत्ती
बळावत आहेत. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विसंगतींनी घेरलेले हे जगातील एक
प्राचीन राष्ट्र महान नियतीच्या सूर्योदयाने जागृत होत आहे. या अनोख्या
वेळी स्मरण असू द्या की या धरतीच्या कणाकणात राम व्याप्त आहे अन्
प्रत्येक निर्णयाच्या वेळी दिशादर्शनाचं कार्य पार्थसारथी श्याम करीत
आहे. विश्‍वास बसत नसेल तर कोणत्याही खेड्यातील अशा ठिकाणी जाऊन पहा की
जिथे चार-पाच भारतीय (ते अशिक्षित, खेडवळ असतील तर आणखी चांगले) बसलेले
असतील. गावच्या चावडीवर जायचं भाग्य कधी मिळालं नसेल तर भारतीय
रेल्वेच्या जनरल (सर्वसाधारण) बोगीतून प्रवास करा. तिथे सुरुवातीला भलेही
भ्रष्टाचार किंवा राजकारण या विषयांवर चर्चा सुरू होईल, परंतु १०-१५
मिनिटांत ती धर्मावर (रिलिजन नव्हे) येईल. तुकोबांची गाथा, ज्ञानेश्‍वरी,
दासबोध, रामचरितमानसच्या चौपाई, कबीर-रहीमचे दोहे, शास्त्रवचनांचे आधार
पुढे येऊ लागतील. माणसं जेवढी साधारण असतील तेवढ्या लवकर त्यांची चर्चा
धर्म-अध्यात्मावर येईल. आजही खेड्यात जाऊन पहा- रात्रीच्या वेळी जय
हनुमान, ॐ नम: शिवाय, महाभारत अशा धाटणीच्या टीव्ही कार्यक्रमांनाच
लोकांची पहिली पसंती आहे. गावागावांत दरवर्षी ग्रामदेवतेची जत्रा
तेवढ्याच उल्हासाने साजर्‍या होताहेत.धर्माच्या परिभाषेत सांगितलेली
गोष्ट आपल्या लोकांना अधिक भावते. या देशातील जनता सहजपणे ज्या गोष्टींशी
एक होते ती गोष्ट म्हणजे धर्म आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या 'स्पीकिंग
ट्री' या उपक्रमांतर्गत मार्च २०११ मध्ये भारतातील शहरी तरुणांचं
सर्वेक्षण प्रसिद्ध झालं आहे. ९१ टक्के तरुणांचा कल धर्म-अध्यात्माकडे
असल्याची बाब यातून समोर आली आहे. (
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/7637389.cms
)कारण धर्म ही भारताची आत्म चेतना आहे. व्यक्ती, कुटुंब, कुल, जाती,
प्रांत आणि राष्ट्राला स्वत:ची एक अंगभूत रचना असते. स्वभाव असतो. एक
संदेश असतो. हा धर्म जाणणे आणि त्याचा निर्वाह करणेच प्रत्येकाच्या
जीवनाचे ध्येय असते. वैयक्तिक जीवनात यशस्वीतेसाठी आणि जीवनाच्या
सार्थकतेसाठी आपल्या स्वभावानुकूल कर्म करणे जेवढे अनिवार्य असते तेवढेच
परिवार, समाज आणि राष्ट्रासाठीही प्रासंगिक असते. व्यक्तिगत आणि सामूहिक
व्यवहारातून असा प्रयत्न चालू असतो. स्वधर्म पालन किंवा अवहेलना यामुळे
राष्ट्राचे उत्थान किंवा पतन होत आले आहे. शिक्षण व संस्काराची प्रत्येक
समाजाची व्यवस्था म्हणजे याच आत्म-चेतना जागरणाचा संस्थात्मक किंवा
पारंपारिक प्रयत्न असतो. संस्कृतीच्या मुळांना चांगल्या रीतीने सिंचित
केल्यास वैज्ञानिक प्रयोगांप्रमाणेच ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा
प्रत्ययाला येऊ शकते. समाज जेव्हा आपल्या आत्म चेतनेनुसार जागृत व्यवहार
करीत असतो अर्थात आपल्या धर्माचे पालन करीत असतो तेव्हा व्यक्ती, केवळ
परंपरेच्या पालनातूनही आपल्या आत्म चेतनेची सहज, जैविक, सर्वोत्तम
अभिव्यक्ती करून आपले अंतिम उद्दिष्ट प्राप्त करू शकते. परंतु समाजाची
आत्म चेतनाच विस्मृतीत गेली असेल तर अशा वेळी यशस्वी आणि सार्थक जीवनाची
पहिली पायरी आत्मचेतनेचा परिचय हीच असू शकते. स्वत:ची ओळख करून घेण्यालाच
'प्रबोध' म्हटले जाते. बोधी गयाच्या 'त्या' वृक्षाखाली गौतमाच्या
आत्मचेतनेचे जागरण झाले आणि या 'प्रबोधा'ने तथागत बुद्धाचा जन्म झाला.
सार्‍या जगातील दु:ख दूर करण्यासाठी संघटित शक्तीचे साक्षात अवतरण बुद्ध
धम्माच्या रूपात झाले. आपल्या आईच्या हाकेने -'जागृत शंकर जागृत', चार
वर्षाच्या शंकराला प्रबोध झाला. यातूनच आद्य शंकराचार्यांच्या रुपाने
अद्वैत वेदांताची पुनर्स्थापना झाली. भारताच्या सुप्त आत्मचेतनेच्या
जागरणाचे हे अनुष्ठान हजारो वर्षांपासून सतत सुरू आहे. ही शृृंखला
अखंडपणे सुरू आहे. व्यक्तिगत प्रबोधाच्या सामूहिक प्रगटीकरणातून हे
राष्ट्र पुन: पुन: आपल्या नियतीकडे अग्रेसर झाले आहे. आधुनिक काळात
कन्याकुमारीच्या श्रीपाद शीलेवर स्वामी विवेकानंदांच्या 'प्रबोधा'मुळे
राष्ट्रीय आत्मचेतनेच्या जागरणाला प्रारंभ झाला आहे. तो आजही सुरू आहे.
२०१३ साली स्वामी विवेकानंदांच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण होत आहेत.
स्वामीजींच्या सार्ध शती समारोहाच्या तयारीला प्रारंभ झालाय. आपल्या जीवन
लक्ष्याच्या 'प्रबोधा'ची ही सुवर्णसंधी आपल्यासमोर चालून आली आहे. 'भारत
जागो ! विश्‍व जगाओ!!' हा मंत्र घरोघर पोहचविण्याचे अभियान मानवतेचा
प्रबोध बनावा, या प्रार्थनेसह हा अंक सादर करीत आहोत. गुढीपाडवा, भारतीय
नववर्षाच्या शुभेच्छा !

--
visit @
www.psiddharam.blogspot.com