Thursday, December 31, 2015

एका हातात बॉम्ब दुसर्‍या हातात गीता

''आम्हाला वारंवार एक प्रश्‍न विचारला जातो आणि तो अनेक दशके विचारला गेलेला आहे की, भारताने गेल्या हजारो वर्षांच्या वाटचालीमध्ये आपला भूभाग विस्तारित का केलेला नाही किंवा जगामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा  प्रयत्न का केला नाही ? त्याचे उत्तर आपण देऊ शकत नसलो तरी काही नामवंत अभ्यासकांनी ते दिलेले आहे. भारतीयांच्या विस्तार न करण्याच्या प्रवृत्तीमागे त्याची मानसिकता दडलेली आहे. त्याचे स्पष्टीकरण करताना हे विद्वान लोक भारतीयांची सहिष्णुता, बेशिस्त, कोणाचाही बदला न घेण्याची किंवा सूड न घेण्याची भावना, परकीयांना आपल्यात सामावून घेण्याची लवचिकता आणि आक्रमणापेक्षा स्वसंरक्षणाला महत्त्व देण्याची प्रवृत्ती याकडेे बोट दाखवतात.''
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी सहलेखक एस. वाय. राजन यांच्या सहकार्याने 1998 साली लिहिलेल्या ‘इंडिया व्हिजन 2020 - अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ या पुस्तकात वरील प्रतिपादन केलेले आहे. डॉ. कलाम यांनी या पुस्तकात हा विषय फार सखोलपणे मांडलेला आहे.
भारतीयांच्या या सार्‍या  मनोवृत्तीचे मूळ त्यांच्या गोंधळलेल्या मनःस्थितीत असते आणि ही गोंधळलेली मनःस्थिती ही आपली राष्ट्रीय प्रवृत्ती आहे. युध्दाचा त्याग करणारा राजा अशोक हा आपल्या देशातल्या जनतेचा आदर्श राजा झाला तेव्हापासूनची अनेक शतके भारतीयांच्या मनःस्थितीला हा संभ्रम वेढून राहिलेला आहे.